वीर शिवा काशिदांचा जन्म ५ मे १६६० रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवा न्हावी आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत
Total Pageviews
Thursday, 5 May 2016
शिवा काशीद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment